'लेह' वारी, भाग १

   आयुष्यभर आठवणीत राहील असा अमोल ठेवा (६५०० km, १९ दिवस) शब्दात बांधण्याचा प्रयत्न करतोय.
              हा तर... !!! गेल्या वर्षी मी आणि तुषार भीमाशंकरला गेलो होतो. दिवसभर झालेल्या गप्पांमध्ये दोन विषय लक्षात ठेवण्यासारखे झाले. १: बुलेट घ्यायची आणि २. लेह ला जायचं. पुढे मग साधारण महिना दोन महिने गेले असतील आणि तुषारचा फोन आला.

तुषार: समीर !!! मी पाडव्याला बुलेट बुक केली.
मी:     काय SSS सहीच.. एकदम...!!! थांब मी पण बुक करून टाकतो. आयला परवा परवा पर्यंत माझ्या समोर पल्सर २२० ची महती गाणारा प्राणी अचानक बुलेट बुक करून आलास पण. भारीच !!!  करणारच शेवटी आपली चॉईस हाय ;)

पुढे अश्याच शिळोप्याच्या (आईचा ठेवणीतला हा शब्द) गप्पा झाल्या आणि दोन दिवसांनी मी पण जाऊन बुलेट बुक केली.  ट्रीपमध्ये चर्चा झालेला एक विषय हातावेगळा झाला होता. बुलेट १० महिन्यांनी मिळणार होती. आता वेध लागले होते दुसऱ्या विषयाचे. "Mission लेह" चे.  त्यानंतर वर्षभर जेव्हा जेव्हा भेटलो, बोललो तेव्हा तेव्हा, किमान एकदा तरी लेह वारीची चर्चा व्हायची. पहिले ७-८ महिने काही वाटलं नाही पण जेव्हा गाडी कधी मिळणार याची चौकशी सुरु केली तेव्हा गाडी मिळायला एक दोन महिने जास्त वेळ  लागणार म्हणून डीलर कुणकुण करू लागला आणि आम्ही "आम्हाला गाडी लवकर द्या !!! लेह ला जायचय"  म्हणून भूनभून करायला लागलो. अखेर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मुहूर्त लागला आणि दोघांनाही एकाच दिवशी गाड्या ताब्यात मिळाल्या. लेहला यंदा १००% जायचं अस ठरवलं असल्यामुळे गाड्या पळवायला सुरुवात केली. कारण २-३ सर्विसिंग (निदान ३००० - ४००० km तरी ) शिवाय गाडी घेऊन जाता येणार नव्हते. ४-५ लांब ट्रीपा मारल्या आणि तो कोटा भरून काढला.
मधल्या काळात कुठून जायचं, कसं जायचं आणि काय काय समान न्यायचं/घ्यायचं या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधून काढली. काही अनुभवाचे आणि काही फुकट असे भरपूर सल्ले मिळाले. सारं काही ऐकून (पटेल ते घेऊन) अखेर १८ ऑगस्टला निघायचं ठरवलं.  १७ ऑगस्ट उजाडला. तुषारला फोन केला, घेऊन जाण्याचं सगळं समान गोळा झाल्याची खात्री केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.०० ला निघायचं ठरलं. ट्रेकिंगसॅग मध्ये सगळं काही भरून ठेवलं आणि झोपलो. पहाटे ४.०० ला उठून अर्ध्या तासात आवरलं आणि सॅग गाडीला बांधायला खाली आलो. सगळे प्रयत्न करून सुद्धा, ती मोठी पिशवी गाडीला नीट बांधता येईना. १० - १५ मिनिटे आणखी प्रयत्न केला पण काही जमेना मग सरळ ट्रेकिंगसॅग न्यायचं रद्द केलं. परत वर गेलो आणि ट्रेकिंग सॅग रिकामी करून सॅडल बॅग (फोटो मध्ये दिसेलच) मध्ये सगळं समान भरलं.  
पंक्चर काढण्याचं कीट, गाडीचे आणखी काही लागणारे पार्ट, कपडे आणि बाकी किरकोळ भरपूर गोष्टी मिळून अंदाजे ३० किलो वजन भरेल एवढं समान होतं आणि ते परत व्यवस्थित लावायचं होतं. या सगळ्या प्रकारात अर्धा पाउण तास गेला आणि तुषारला उशीर होतोय म्हणून फोन करायचा राहिला. इकडे हा बाबाजी ५.३० लाच निगडी नाक्यावर येऊन उभा राहिला होता आणि दर ५ मिनिटांनी फोन करत सुटला होता. मी इकडे पळापळ करून (३० किलो घेऊन) घामाघूम झालो होतो आणि मध्ये मध्ये याचे फोन. कसंबस गाशा गुंडाळला आणि ६.०० ला घरून निघालो. १८ ऑगस्ट उजाडण्या आधीच निघण्याचा बेत फसला होता. ढगाळ वातावरण होतं पण पाऊस पडत नव्हता म्हणून मग आणखी उशीर न करता रेन कोट नुसताच बरोबर घेतला. पण नशिबात काही वेगळच लिहिलं होतं. घर सोडून १-२ km झाले असतील आणि तो (पाऊस) आला. मग न थांबता तसाच भिजत निगडी नाका गाठण्याचा ठरवलं आणि १५ मिनिटात तिथे पोहोचलो. आमच्यावर मुक्त तोंडाने फुले उधळण्यासाठी,  साहेब आमची वाट बघत उभे होतेच. गुमान सगळं ऐकत मी अख्खा रेनकोट चढवला पण त्या शहाण्याने बडबडीच्या  नादात नुसतेच जर्किन घातले. मी आपला हो हो म्हणत निघू म्हणालो आणि आवरत घेतलं. देशाच्या उत्तर टोकाचा प्रवास सुरु झाला होता.
           देहूरोड येई पर्यंत पावसाचा जोर वाढला आणि आम्ही थांबलो. श्रीमंत गाडी थांबवून उतरले, गाडी साइडस्टॅंडला लावली आणि रेनकोट घालू लागले. कशी कुणास ठाऊक पण आम्ही गप्पा मारत असतानाच त्याची  गाडी साइडस्टॅंडच्या विरुद्ध दिशेला कलंडली आणि पडली. मी मागेच उभा होतो पण, आधीच वजनदार (मी नव्हे, गाडी) आणि त्यात आणखी ३० किलो वजन जास्त असलेलं ते धूड मागे उभा राहून सांभाळणे केवळ अशक्य होतं. तरी लगेच पुढे झालो आणि जमिनीला आलिंगन दिलेली गाडी झटक्यात उचलली. "माझ्यात एवढं बळ कुठून आलं ?" माझं मलाच आश्चर्य वाटलं. गाडी पडली आणि त्याची पुढच्या ब्रेकची लिवर अर्धी तुटली. ती वाकून वजन न पेलवल्यामुळे तुटताना मी अगदी हतबल होऊन पहिली होती. प्रवासामध्ये अडथळ्यांची परीक्षा सुरु झालीच होती त्यात आणखी भर पडली. थोडसं वाईट वाटलं पण काय करणार, अर्धी तुटकी ती कांडी टाकली बॅग मध्ये आणि निघालो पुढे. लोणावळ्यात थोडावेळ थांबलो, पाऊस पण थांबला होता,सगळीकडे कसं हिरवागार टवटवीत होतं. गाड्या पुन्हा एकदा चेक केल्या आणि निघालो.
        घोडबंदर मार्गे अहमदाबाद हायवे पकडायचा आणि मग तो धरून, थेट उत्तरे कडे प्रयाण करायचे असं ठरवलं होतं. मुंब्र्या पर्यंत न चुकता आलो, टोल नाका पार करून हायवेला लागलो. आधी एकदा घोडबंदर मार्गे विरारला गेल्यामुळे, एक २-३ km पुढे गेल्यावर आपण रस्ता चुकलो आहोत कि काय असं वाटायला लागलं.  "तो मी नव्हेच" असं तो (रस्ता) ओरडून ओरडून सांगत होता आणि तेच बरोबर होतं. तुषारला रस्ता चुकलोय असं खुणेने सांगितलं आणि एक ठिकाणी चौकशी केली तर कळलं आम्ही आग्रा हायवेवर आहोत. झालं कल्याण... असो..थोडी विचारपूस केल्यावर पुढून भिवंडी मार्गे रस्ता आहे हे कळलं, पण भिवंडीच्या गर्दीतून आणि खराब रस्त्यावरून जाण्यात वेळ जाणार होता म्हणून मग हो-नाही करता करता मागे वळायच ठरलं. परत ठाण्यात येऊन घोडबंदर रोडला लागलो. आता रस्ता ओळखीचा वाटू लागला. लोणावळ्याहून निघाल्यावर कुठेही थांबलो नव्हतो. पोटात कावळे ओरडण्याबरोबर नाचायलाही लागले होते आणि वर ढग गडगडायला लागले होते. सगळीकडे अंधारून आलं होत. सकाळचे ९.३० वाजलेले असून सुद्धा संध्याकाळी ७.०० चं वातावरण होतं. थोडी विश्रांती घ्यावी म्हणून मग एक हॉटेल बघून थांबलो. रेनकोट वगैरे काढून ठेवताना नजर हॉटेलचा अंदाज घेत होती (साफ सफाई स्वच्छता वगैरे वगैरे). हॉटेलचा मालक अस्सल मुस्लीम पेहराव, डोक्यावर टोपी इत्यादी गोष्टी घातलेला.  म्हंटल मुस्लीम असला म्हणून काय झालं, हॉटेल तसं बर दिसतंय. नित्यनियमा प्रमाणे काय काय मेनू मध्ये आहे, ते (पाठ झालेलं) त्याने सांगितलं. ऑर्डर गेली "एक कांदा उत्तपा आणि इडली सांबर". लगेच ती ५ मिनिटात आली सुद्धा पण घोर निराशेला बरोबर घेऊनच, अगदीच बकवास चव. बाहेर पाऊस धो-धो सुरु झाला होता आणि मी काहीतरी चांगलं खायचं सोडून बेचव उत्तपा खात होतो. तुषार पण वाकडतिकडं तोंड करून समोर आहे ते गप गिळत होता. माझा उत्तपा थोडा खाऊन झाल्यावर या महाराजांनी सांगितलं, "दोनीही गोष्टींना मटणाचा वास येतोय". त्यातल्यात्यात तुषारला तर जास्तच. त्यात हा प्राणी सगळे प्राणी खातो तरीही त्याला वास सहन होत नव्हता. का कुणास ठाऊक पण  मला तसला कसलाही वास आला नाही. तसच अर्ध पोटी खाणं टाकलं, चहा प्यायला आणि रेनकोट घालून भर पावसात तिथून निघालो. १०.०० वाजले तरीही मुंबापुरी अजून फार काही लांब गेली नव्हती. आजचा पहिला मुक्काम होता घरापासून ८५० km लांब उदयपूरला, म्हणून मग सुसाट गाडी हाकायला सुरुवात केली. रस्ता एकदम चकाचक, ८०-९०-१०० km तशी वेगाने दोन बुलेट पळत होत्या. पाऊस धो-धो कोसळत होता, समोरचं १०० - २०० फुटाच्या पलीकडे काहीच दिसत नव्हतं, इतका तो जोरदार कोसळत होता. तो थांबायचं नाव घेत नव्हता आणि आम्ही थांबायचा काही प्रश्नच नव्हता. चकाचक रस्ता असला तरी उतार चढ असल्या मुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली होती. अंगावर उडणाऱ्या पाण्याची फिकीर न करता भरधाव त्यातून आम्ही निघून जात होतो. एका पाटोपाठ एक ट्रक मागे टाकत आणि मधूनच एखाद-दोन चारचाकी सप्पकन आम्हाला मागे टाकून पुढे जात होत्या. अगदी महाराष्ट्राच्या सिमे पर्यंत हाच खेळ चालू होता. महाराष्ट्र सिमे जवळचा टोल नाका येई पर्यंत दुचाकी अगदी बोटावर मोजण्या इतक्याच (आमच्या दोन सोडून) दिसल्या. टोल नाक्याला पोहोचलो तेव्हा पावसाचा जोर कमी झाला होता, मग तिथेच एक रिकाम्या लेन मध्ये गाड्यांना आणि स्वतःला विश्रांती देण्यासाठी थांबलो.चांगली १५-२० मिनिटे आराम केल्यावर पुढचा प्रवास चालू केला. आमचा नाष्टा झाला होता पण गाडीचं काय? सकाळी निघाल्या पासून ३०० km झाले असतील तरी ती अजून उपाशीच होती, म्हणून मग थोडं पुढे गेल्यावर एक पंप दिसला आणि आत वळलो. पंप मस्त धुवून काढून, हार फुलांनी सजवलेला होता. पूजा अर्चा झालेली होती. पंपाकडे जाताना, दोन विचित्र माणसं, दोन काळ्या बुलेट, ते सुद्धा MH-14 पासिंगच्या, इकडे कुठे आल्या म्हणून लोकं कुतुहुलाने आमच्या कडे बघत होती. आम्ही आपलं गेलो आणि दोनीही टाक्या फुल करून घेतल्या. इतक्यात पंपाचा मालक बाहेर आला. कुठून आलात, कुठे चाललात वगैरे चौकशी केली. त्याला त्याच्या प्रश्नांची आश्चर्यकारक उत्तरं मिळाल्यावर गड्याने आमचे नाव पत्ते वगैरे लिहून घेतले. पंपाला एक वर्ष पूर्ण झालं म्हणून ही सजावट, पूजा वगैरे आहे असं त्याच्या कडून कळलं आणि सोबत सामोसे चहाचा नाष्टा पण मिळाला. सामोसे म्हणजे माझा जीव कि प्राण... अहाहा... !!! क्या बात... !!! पावसात भिजून आल्यावर गरम गरम सामोसे आणि चहा... वा... वा... एकदम मस्तच ! चांगले दोन तीन सामोसे हाणले. आणखी घेणार होतो पण "ऊस मुळा सकट खाऊन नये" हा वाक्प्रचार आठवला आणि स्वतःला आवरलं. सकाळच्या बेचव नाष्ट्याची उणीव याने भरून काढली. खाऊन पिऊन झाल्यावर निघायच्या वेळेला गोधरा मार्गे उदयपूरला जाण्याचा सल्ला मालकाने दिला. गाडीचं जेवण आणि आमचा नाष्टा दोनीही झालं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. गाडीचा वेग ताशी ९० -१०० km ठेवला होता. त्याच्या वर गेला तर बुलेट इतका थरथराट करते कि हातासकट अख्या शरीराला मुंग्या यायला लागतात. ९० ने सुटणे म्हणजे काय याचा शब्दशः अनुभव घेत दुपारी २.३० - ३.०० पर्यंत गाडी दामटत होतो. पोटात पुन्हा कावळे डिस्को करायला लागले म्हणून थांबलो. जेवलो ( तेवढीच गाडीला पण विश्रांती) आणि पुन्हा निघालो. संध्याकाळचे ६.०० वाजत आले तेव्हा बडोद्याची वेस दिसायला लागली. गोधरा मार्गे जायचं असल्यामुळे बडोद्याच्या बायपास वर अहमदाबाद रोड सोडला आणि एका गंभीर घटने मुळे उजेडात आलेल्या गावाचा (गोधाराचा) रस्ता धरला. उन्हं उतरायला लागली होती आणि उदयपूर अजून चिक्कार लांब होतं. घरातून निघताना, "रात्री गाडी न चालवण्याची सक्त ताकीद दिली गेली होती (दोघांनाही)". स्वतःच्या आणि गाडीच्या तब्यतीसाठी ती अमलात आणायची ठरवलं होतं. ज्या गावाबद्दल नुसत्या बातम्याच वाचल्या, ते कसं असेल, तिथली लोकं कशी असतील आणि आपण तिथेच रहायचं का? याचा हिशोब मनात सुरु झाला. पण आम्हाला गोधरा सुद्धा गाठता आलं नाही. अंधाराचं साम्राज्य पसरलं, तेव्हा आम्ही गोधरा पासून ५३ km अलीकडे "हलोल" मध्ये होतो. मग तिथेच पहिला मुक्काम पडला. सकाळी निघायला झालेला एक दीड तास उशीर, आग्रा रोडची गडबड आणि त्या धुडाला (बुलेटला) घेऊन १०० km ताशी वेग मर्यादा ओलांडता न येणे या मुळे ठरलेल्या योजनेचा (उदयपूरला पोहोचण्याचा) बट्याबोळ झाला होता. असो...त्या छोट्याश्या गावामध्ये एक छोटेखानी हॉटेल शोधलं, खोल्या चांगल्या असल्याची खातरजमा केली आणि तिथेच थांबण्याचा निश्चय केला. लगेच घरी फोन फोनी करून सगळा रेपोर्ट दिला आणि रिकामा झालो. मस्त फ्रेश झालो आणि जेवलो. हॉटेल लहान होतं पण जेवण मात्र अप्रतिम होतं. साधीच ऑर्डर दिली. दाल फ्राय, जीरा राइस, रोटी, पनीर टिक्का, मटर पालक. त्यात जोडीला ताक. अक्षरशः पोट भरून एक एक पदार्थ हाणला आणि तृप्त झालो. पहिला मुक्काम चुकलाच होता, त्यामुळे पुढचे मुक्काम बदलेले. मग पुढच्या दोन तीन दिवसाचा प्रवास आराखडा बांधला, कुठे थांबायचं, काय करायचं (साहेबाच्या भाषेत प्लान A, प्लान B वगैरे वगैरे) ठरवलं आणि सकाळी लवकर निघायचं ठरवून झोपलो. जवळपास ६०० km गाडी चालवून प्रवासाचा पहिला दिवस संपला होता.
                 डोळे उघडले तेव्हा ६.०० वाजले होते आणि ठरलेल्या प्लानचे पुन्हा १२ वाजले होते. आवरून निघता निघता ७.३० झाले. मग नाष्ट्याचा बेत पुढे ढकलून निघालो, म्हंटल सांच्याला जयपूरला पोहोचलो तरी बेहत्तर. रोड एकदम चकाचक होता त्यामुळे एका त्रासातून सुटका झाली होती. दोन तास तुफान गाडी चालवल्यावर एके ठिकाणी (गावाचं नाव लक्षात नाही) न्याहरीसाठी थांबलो. गाडीवरून उतरलो आणि हॉटेल वजा दुकानाबाहेर भजीची वाट बघत आम्ही थांबलो. गरम गरम भजी आणि चहा. लाजवाब नाष्टा !!! आम्ही तिकडे हातातोंडाची लढाई करत होतो आणि इकडे गावकरी लोक दोनीही गाड्यांभोवती जमा झालेले. काय दिमाखात त्या दोघी उभ्या होत्या म्हणून सांगू..!!! आणि गावकऱ्यांच्या तोंडावर आश्चर्यमिश्रित ते भाव !!!. कोणी म्हणे डीझेल वर चालत असेल, कोणी त्याची किंमत किती? याचा विचार करत होता, गाडी जवळ उभं राहून आपापसात कुजबुज चालू होती. असो... नाष्टा झाल्यावर गाडी जवळ गेलो तेव्हा सगळे बाजूला झाले. यावेळी स्टार्टर वापरायचा सोडून मुद्दाम गाडीला किक मारली. थोडा भाव खायला चान्स मिळत असेल तर कोण सोडेल? पहिल्या किक मध्येच धडधड धडधड करायला लागली आणि धडधडीचा दमदार आवाज करत तिथून आम्ही एकदम शान मधे कल्टी मारली. उदरभरण झाले होते त्यामुळे आता २-३ तास चिंता नव्हती. गाडी सुसाट पळत होती. पहिल्या दिवसाचा ९० ने सुटण्याचा अनुभव पुन्हा एकदा घेत होतो.

पावसाळा चालू होता त्यामुळे सगळी कडे मस्त हिरवा गालीचा पसरलेला आणि त्यात सरळसोट टार रोड. त्या वातावरणात बघता बघता कधी उदयपुरला पोहोचलो कळलंच नाही. उदयपुर मधे शिरताना सीमेवरचं बांधकाम पाहून आपण राजस्थान मध्ये आहोत हे लगेच जाणवलं. उदयपुर गावात शिरायच्या आधीच बाह्यवळण रस्त्याला वळलो आणि चित्तोडगडचा मार्ग धरला. साला तो रोड पण झक्कास. मुंबई सोडल्यापासून गोल्डन क्वाड्रीलॅट्रल काय चीज आहे याचा km - km वर (पदापदावर सारखं) अनुभव घेत होतो. भाजप सरकारच्या काळात सुरु झालेली आणि नंतर प्रत्यक्षात आलेली हि कल्पना खरच स्तुत्य आहे.  भूक तशी फार लागली नव्हती म्हणून मग एके ठिकाणी फक्त चहा प्यायला आणि पुढे प्रवास सुरु केला. चित्तोडगडला सुद्धा बगल देऊन आम्ही आमचा मोर्चा किशनगड कडे वळवला. वाटत होतं जयपूरचा ठरलेला मुक्काम आज होणार म्हणजे होणार. कंटाळा आला कि थोडा वेळ थांबणे. चहा वगैरे मारणे आणि पुढे जाणे. दोन दिवस हेच चालू होते आणि पुढे दोन आठवडे हेच करणार होतो.  संध्याकाळचे ६.०० - ६.३० वाजत आले तेव्हा नासिराबादच्या अलीकडेच पोहोचलो होतो. पुन्हा एकदा ढाब्यावर थांबलो, तोंड धुवून फ्रेश झालो आणि चहा मागवला. ढाब्यावर काही ट्रकवाले जवळ आले. पुन्हा चौकशी सुरु झाली? विचारपूस करताना "फौज में हो क्या?" हा प्रश्न आला. तसा हा आधी काही ठिकाणी थांबलो तिथे हि आला होता, पण तेव्हा आम्ही खरं उत्तर दिलं होतं. या वेळी मात्र तुषारने "हां, फौज में है, जम्मू जा रहे है" असं बिंदास सांगून टाकलं. असो... चहा प्यायला आणि सुटलो किशनगडकडे. ७.०० वाजले किशनगड जवळ पोहोचायला. सूर्य मावळून गेला होता तरी आम्ही गाडी चालवत होतो. एकच दिवस नियम पाळून आम्ही तो लगेच दुसऱ्या दिवशी मोडला होता. जयपूर आणखी १०० km लांब होते. अंधार असून सुद्धा जोरात गाडी चालवायची खुमखुमी अजून गेली नव्हती. मनात ठरवलं होतं, आज उशीर झाला तरी चालेल, पण जयपूर गाठायचच. पण एके ठिकाणी गडबड झाली. जोरात चाललो असतानाच एका ट्रेलरला ओवरटेक करताना धडाधड एका पाठोपाठ एक, असे एकदम चारपाच मोठ्या मोठ्या खड्यात गेलो. माझ्या पाठोपाठ तुषार पण त्याच मार्गाने. म्हंटल आता काही खर नाही, जातोय त्याच्या (ट्रेलरच्या) खालीच. गाडी सांभाळता सांभाळता नाकी नऊ आले. तेव्हा जाणीव झाली कि आपण आता थांबलं पाहिजे. एकतर अंधार त्यात असे खड्डे पुन्हा येऊ शकतात, म्हणून मग किशनगडच्या थोडसं पुढे एक चांगलं हॉटेल बघितलं आणि गाडीला विश्रांती द्यायचा निर्णय घेतला. तुषार जाऊन रूम बघून आला. ८००/१००० रुपये एक रूम. बोंबला, फक्त ८ -१० तासासाठी १००० रुपये मोजावे लागणार होते. पण नाईलाज होता. दुसरं हॉटेल शोधण्याची अजिबात इच्छाहि नव्हती आणि तेवढा वेळाही नव्हता. दिवसभर गाडी चालवून दमल्यामुळे निदान झोप तरी शांत लागावी म्हणून रूम घायायचं ठरवलं. तुषार पूर्ण व्यवहार करून येई पर्यंत मी सगळं समान गाडी वरून उतरवलं. उशीर झाला होता म्हणून पटापट सगळं आवरलं आणि जेवायला आलो. जेवलो, दिवसभराचा सगळा हिशोब मांडला, तिसऱ्या दिवशी निदान चंडीगड तरी गाठू असं ठरवलं आणि परत रूमवर आलो. दार उघडून बघतो तर काय, सगळी कडे किडेचकिडे. एकतर हॉटेल हायवे वर त्यात पाऊस पडून गेलेला, रूम सगळीकडून बंद असून सुद्धा हे कुठून कसे प्रकट झाले कुणास ठाऊक? हॉटेल मालकाला बोलावून सगळा प्रकार दाखवला आणि रूम बदलून घेतली. दुसऱ्या रूम मध्ये पण तीच तऱ्हा पण किड्यांच प्रमाण थोडं कमी होतं म्हणून फायनल केली. किड्यान पासून सुटका हवी म्हणून मग दिवा मालवला, एका कोपऱ्यात फोनची टॉर्च लावून बिनधास्त झोपलो.. ६९० km प्रवास करून आजचा दुसरा दिवस संपला होता.
            सगळे किडे टॉर्चकडे गेल्यामुळे झोपेच खोब्र नाही झाल. आपसूकच उठायला नेहमी प्रमाणे उशीर झाला अन सगळं आवरून निघता निघता ८.०० वाजले. आज चंडीगड मुक्काम ठरवला होता. होईलच याची शाश्वती नव्हती. सकाळी ८.०० ला जे निघालो ते डायरेक्ट १०.१५ ला ढाब्यावरच थांबलो. जेव्हा थांबलो तेव्हा आम्ही जयपूर बाह्यवळण मार्गावर होतो. नाष्ट्याला काय??? विचारलं तर काहीच नाही, फक्त जेवण मिळत म्हणाला. मग काय जेवायचं ठरलं.
तुषार, एका निवांत क्षणी
म्हंटल आता जेवलं कि परत ३.०० वाजे पर्यंत काळजी मिटेल. 
मसुराची झणझणीत उसळ, फुलके, लोण्याचा एक मोठ्ठा गोळा, दाल फ्राय आणि भात. मारला अडवा हात दोघांनी पण. प्रत्येक फुलक्याला भरपूर लोणी लावून आत्मा तृप्त होई पर्यंत जेवलो आणि थोडा आराम करून निघालो. थोडसंच पुढे गेलो असू, तर समोर आभाळ भरून आलेलं दिसलं. सगळीकडे अंधारून आलेलं. एक दिवस (दुसऱ्या दिवशी) रेनकोट पासून सुटका मिळाली होती पण आज ती मिळेल असं समोर बघून बिलकुल वाटत नव्हतं. पावसाचे मोठे मोठे थेंब पडायला सुरुवात झाली तेव्हा एका झाडाखाली थांबून रेनकोट चढवला. गाडीला किक मारली आणि निघालो. जस जसं पुढे जाऊ लागलो, पावसाचा जोर आणखी वाढू लागला. तो इतका वाढला कि पहिल्या दिवसासारखच पुढे १०० -१५० फुटा पलीकडे दिसायचं बंद झालं. समोर एक खिंड दिसत होती. मनात वाटत होतं, खिंड ओलांडली कि जोर कमी होईल, पण कसलं काय, खिंडी पलीकडे तर पाऊस आणखी वाढला. समोरचं दिसण्याचं प्रमाण आणखी कमी झालं. आमच्या दोघांमधलं अंतर फार फार तर १० फुट ठेवलं असेल आम्ही. पावसाचे थेंब हेल्मेटवर टनाटन आदळत होते. मधूनच २-४ थेंब हेल्मेटला हि न जुमानता आत येत होते. चेहरा सगळा ओला झाला होता. दोन दोन जर्किन घातले होते तरी अख्खा भिजलो होतो. एवढं असून सुद्धा गाडी ७०-७५ ने हाकतच होतो. पण हे कितीवेळ करणार? थोडं पुढे गेल्यावर आमचा जोर कमी झाला पण पावसाचा आहे तसाच होता. जरा वेग कमी केला तर ती बुलेट सुद्धा भूकभूक करायला लागली. म्हंटल आता या पावसात हि जर बंद पडली तर आपलं काही खरं नाही. धड कोणी मदतीला पण थांबणार नाही असा तो भाग होता. तसाच तिचा कान पिळत, तिला चालू ठेवली आणि पुढे जात राहिलो. थोड्याच वेळात तिची भूकभूक बंद झाली आणि मला हायसं वाटलं. पाऊस मात्र अजून चालूच होता. आज कसली परीक्षा देव घेत आहे ? हाच विचार राहून राहून मनात पिंगा घालत होता. चंडीगड लांबच राहिलं आम्ही निम्म्यात तरी पोहोतोय कि नाही अशी शंका येऊ लागली. अखेर बराच वेळ भिजत गाडी चालवल्यावर त्याला आमच्यावर दया आली आणि तो थांबला. थांबला कसला??? आम्ही त्याभागातून पुढे आलो म्हणून आमच्यासाठी थांबला. तिकडे तू धुमाकूळ घालतच असणार. पुढे पुढे जात होतो. एके ठिकाणी नदीचा पूल आला आणि अख्या पुलावर तळं साचलेलं. रस्त्यावर जवळ-जवळ  एक फुट पाणी असेल . दुसरा पर्यायी रस्ता नव्हताच. घातली गाडी मग पाण्यात. आधी तुषार गेला आणि त्याच्या मागे मी. मोठ्या गाड्या जात आहेत त्यांना पाहून, रस्त्याचा अंदाज घेत घेत पुढे जात होतो. सायलेन्सर मध्ये पाणी जाऊ नये म्हणून जोरात जोरातरेझ  करत होतो. पण एके ठिकाणी समोरच्या गाडी मुळे तुषार थांबला, सायलेन्सर मध्ये पाणी गेलं आणि गाडी बंद पडली. त्या बरोबर आपणही लटकून ताप वाढवायला नको म्हणून मी त्याच्या बाजूने तसाच गाडी रेझ करत पुढे निघून गेलो. कसाबसा पूल ओलांडला, बाहेर पडलो आणि थांबलो. २-३ मिनिटे गेली तरी हा बहादूर अजून का नाही आला? हे पाहण्यासाठी गाडी लावली आणि चालत परत मागे जाणारच तेवढ्यात महाशय गाडी घेऊन आलेच. पुलावर जरा वरच्या भागात पाणी कमी होतं तिथे नेऊन, त्याच्या (आणि माझ्या पण) नशिबाने ती चालू झाली होती. गाडी चालू आहे हे बघून किती बरं वाटलं होतं तेव्हा. मग थोडा वेळ तिथेच थांबलो. गाडीला आणखी काही झालं आहे का बघितलं आणि पुढे निघालो.
            पाऊस रिमझिम चालू होताच. दिल्लीला न जाता हरयाणा मधून रेवाडी - रोहतक - पानिपत असा मार्ग ठरवला होता. उद्देश फक्त एकच, जास्त गर्दीत न जाता लवकरात लवकर चंडीगडला पोहोचणे. पण नशिबात काहीतरी वेगळच लिहून ठेवलं होत. जस आम्ही हायवे सोडून रेवाडीच्या रस्त्याला लागलो, तसं पुन्हा पावसाचं थैमान चालू झालं. रोड एकदम खराब आणि त्यात जोरदार पाऊस. जसा सकाळी होता त्या पेक्षा जरा जस्ताच पण कमी नाही. थोडं पुढे गेल्यावर तुषारच्या बुलेटच्या मागच्या ब्रेक मधून कसला तरी विचित्र अवज येऊ लागला. २-३ वेळा थांबून पाहिलं पण काहीच कळेना. तसेच पुढे निघालो. रेवाडी सोडून पुढे झज्जर कडे निघालो होतो. रस्ता आणखीनच खराब झाला. एका मोठ्या खड्यात गेल्यावर माझ्या बुलेटच्या पुढच्या चाकातून पण काही तरी घासल्याचा अवज येऊ लागला. दोनीही गाड्यांची आणि आमची वाट लागली होती, पण नाईलाज होता. पुढे जात राहणे क्रमप्राप्त होतं. बऱ्याच ठिकाणी रोडचं काम चालू होतं म्हणून आम्हाला सारखा रस्ता बदलावा लागत होता. २-४ km जरा कुठे चांगला रोड लागलाय अस वाटू लागताच परत खड्यांच राज्य चालू व्हायचं. जयपूर जवळ, सकाळी १० - १०.३० ला जे काही खाल्लं होतं तेवढ्यावरच होतो, त्यानंतर जेवायला सुद्धा उसंत मिळाली नव्हती. त्यात सतत पाऊस चालू असल्यामुळे दोघेही नखशीकांत भिजलो होतो आणि आणखी भर म्हणजे गाडी चालवण्याचा वेग थोडा कमी झाला होता. पण त्यातही मी एक सुख शोधलं होतं. ते होतं आजू बाजूच्या निसर्गाचं. दोनीही बाजूला नजर जेईल तिथ पर्यंत हिरवीगार शेती पसरलेली होती. हिरव्या रंगा शिवाय दुसरा रंगच दिसत नव्हता. वर अंधारून आलेलं आभाळ, धो धो कोसळणारा पाऊस, आजूबाजूला हिरवीगार शेती आणि रस्त्यावर भिजत चाललेलो आम्ही दोघे. मस्त वाटत होतं. रोहतक ओलांडून पुढे गेल्यावर एक ठिकाणी आम्ही चहा प्यायला थांबलो. ६ वाजून गेले होते. आज कुठे पर्यंत मजल मारता येईल याची आमच्यात चर्चा सुरु झाली.
मी: जमलं तर जाऊ चंडीगडला...
तुषार: रस्ता असला भंगार असेल तर आपण पानिपतला सुद्धा पोहोचू कि नाही याची शाश्वती नाही.
मी: बघू रे!!! जमेल तेवढं जाऊ.
५-६ तास खड्ड्यांमध्ये गाडी चालवून बिचारा वैतागला होता, हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत. मी मात्र निसर्गात सुख शोधून रिकामा झालो होतो त्यामुळे खड्यांच काही वाटत नव्हतं. असो... आम्ही तिथून निघालो आणि पुढे गाडी चालवताना परत तेच गुऱ्हाळ चालू झालं. बघता बघता तुषारचा संयम सुटला. माझी आणि त्याची थोडी बाचाबाची झाली आणि साहेब एकदम पेटले आणि पुढे....
 तुषार :  "मी नाही येणार तुझ्या बरोबर. आपण वेगळे वेगळे जाऊ. तुला पाहिजे तिकडे तू जा, मला पाहिजे तिकडे मी जातो.
मी (शांतपणे): "राजे, शांत व्हा !!! अजून आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचाय, इतक्यातच नांगी टाकू नका...
तुषार: असलं कसलं प्लान्निंग रे तुझं??? रस्ता कसा आहे वगैरे माहिती करून घायायला काय झालं होतं???
मी (मनात): आता याला कोण सांगणार कि गुगल वाट्टेल ते शोधून देत नाही? त्याला सुद्धा काही मर्यादा आहेत. इथे रस्ते कसे आहेत, त्यांची परिस्थिती काय हे मी पुण्यात बसून कस शोधणार होतो ?
तुषार: अरे तीन दिवस झाले नुसती गाडी चालवतोय? पाहायला काहीच मिळालं नाही..... मी काय फक्त गाडी चालवायला आलेलो नाहीये.
मी (पुन्हा मनात): ऑ SSS !!!  तीन दिवस आजू बाजूला जे सृष्टीसौंदर्य मी पाहिलं.. ज्या नवीन गोष्टी मी अनुभवल्या, मी पहिल्या त्या न पहाता याने काय डोळे मिटले होते का? आयला एवढा सगळं नवीन पाहायला मिळालं तरी म्हणतो काही पहिलच नाही.... !!! कमाल आहे याची...
मी: अबे आधी आपण पानिपतला पोहोचू मग बघू काय करायच ते.. तो पर्यंत गप्प बस आणि गाडी चालवत रहा...
          सूर्य मावळला होता, ७ वाजून गेले होते. पुढचा अर्धा तास आम्ही दोघेही फक्त गाडी चालवत होतो, एकमेकांना दिवा(गाडीचा) लावून रस्ता दाखवत होतो. हे सगळ गपचूप चालू होतं, एकही शब्द न बोलता. पानिपतचा बायपास आला तेव्हा तिकडे न वळता सरळ शहरात शिरलो. अंधारात गाडी चालवल्यावर काय होते हे माहित असल्यामुळे चंडीगडचा मुक्काम पुढे ढकलला होता. पाहिलं हॉटेल शोधलं, ते खूप महाग वाटलं. म्हणून आणखी दोन चार हॉटेलं पहिली तर पाहिलं हॉटेल स्वस्त वाटायला लागलं, मग १५-२० मिनिटे फिरून परत त्याच हॉटेल मध्ये गेलो. रूम बुक केली आणि सगळ ओलं-कच्च समान घेऊन आम्ही दोघे रूम मध्ये गेलो.
           इतका वेळ शांततेत गेल्यामुळे साहेबांचा पारा उतरला होता आणि ते नॉर्मल वागू लागले होते. आम्ही ओलं झालेलं एक एक समान बाहेर काढून ठेवत होतो. पाहता पाहता सगळी बॅग रिकामी झाली. काही गोष्टी भिजू नयेत म्हणून प्लास्टिक पिशव्यांमध्ये ठेवल्या होत्या, त्या सुद्धा ओल्या झाल्या होत्या. लाडूच्या पिशवी मध्ये साधारण २० एक रव्याचे लाडू असतील त्यांचा सगळा मिळून एकच लाडू झालेला (पुढे काही दिवस आम्ही एकच लाडू थोडा थोडा खात होतो). पोह्याचा चिवडा आणला होता. त्या पिशवीत थोड्या चिवड्याच उपीट झालं होतं (कसं ते समजून घ्यावे).  जी माझी परिस्थिती होती तीच तुषारची पण होती. त्याच्या कडे गाडीचे पार्टस होते, कसे ?? तर भिजलेले. एक एक काढून चांगलं पुसून गड्याने एका कडेला ठेवले. अख्या रूम मध्ये समान पसरलं होतं. बरचसं समान प्लास्टिक पिशव्यांमध्ये असून सुद्धा, साला, त्या पावसाने आमच्या सकट एक पण गोष्ट कोरडी सोडली नव्हती. सगळ काही वाळावं म्हणून AC लावला, पंख लावला आणि बसलो गप्पा हाणत. दिवसभराच्या त्रास बद्दल. पुढच्या प्रवास बद्दल. झालेल्या भांडणा बद्दल. एका वरून एक विषय निघत होते. भूक कधीच पळून गेली होती. हॉटेल मध्ये जेवायची सोय होती पण जास्त भूक नसल्यामुळे जेवायला रुमच्या बाहेर जायचा मूड नव्हता. तुषारने काही पराठे आणले होते.... म्हंटल बाहेरून लोणचं अणु आणि खाऊ पराठे. पण बाहेर कोण जाणार??? दोघेही कांटाळलेलो.... पुन्हा भांडण व्हायची चिन्हे. मग एक शक्कल लढवली. रिसेप्शनला फोन लावला आणि त्यांच्या कडूनच लोणचं (फुकटात) मागवलं. तोही खुश आणि मीही खुश. मग काय पराठे हाणले. मोठ्या लाडूचा छोटा छोटा भाग खाल्ला, सोबतीला पोह्याचा चिवडा होताच. जेवण रुपी नाष्टा आटोपल्यावर पुढच्या दिवसाची रूपरेषा ठरली. चंडीगड १५० km होते. चंडीगडला सकाळी लवकर पोहोचायचं. गाडी सर्विसिंग करून घ्यायची (लगेच तेव्हा सर्विस सेंटरला फोन लावून येणार असल्याची माहिती दिली), कृष्णाला (माझा मित्र) भेटायचं आणि त्याच्या कडेच राहून आराम करायचा, अस ठरलं. आम्ही येत आहोत हे मी कृष्णाला आधीच सांगितलं होतं त्यामुळे हॉटेल शोधायची भानगड नव्हती. बस, ठराव मंजुर झाला आणि पलंगावर अडवा झालो. कधी झोप लागली ते कळलंच नाही. आयुष्यात पहिल्यांदा, धो धो कोसळणाऱ्या पावसात, इतका वेळ गाडी चालवली असेल. पावसाने भरलेला तिसरा दिवस पुन्हा जवळपास ६०० km अंतर कापून संपला होता.
           सकाळी जरा उशिराच जाग आली. आज तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी त्या मनाने जरा कमीच गाडी चालवायची होती (फक्त १५० km). छान सगळं आवरलं आणि दोघेही निघालो. आज आपण ठरलेल्या ठिकाणी लवकर पोहोचणार म्हणून झक्कास वाटत होतं. काळजीच काही कारण नव्हतं. पण असा एकही दिवस जाईल तर शपथ!!! चौथा दिवस पण कायम स्वरूपी आठवणीत राहील असाच निघाला. रोज सकाळी निघताना टाकी फुल करणे आता नियम झाला होता. आदल्यादिवशी पोहोचता पोहोचता दोघांच्याही गाड्यां मधलं पेट्रोल संपत आलं होतं म्हणून मग पानिपत सोडून २-३ km पुढे गेल्यावर एका पेट्रोल पंपावर थांबलो. तुषारने पेट्रोल भरल्यावर मी पेट्रोल भरायला पुढे झालो. पेट्रोल भरून झालं आणि कस कुणास ठाऊक???  पण टाकीच झाकण बंद करताना माझा जोर झाकणासकट त्याला लावलेल्या चावीवर पण पडला आणि चावी मोडली. झाला का बाल्या आता...!!! अर्धी चावी हातात आणि अर्धी चावी झाकणात. आता पुढे काय ???... तुषारला झालेला प्रकार सांगितला... "तरी तुला म्हणत होतो, आणखी एक चावी बरोबर घे, तर मला उडवून लावलंस.... कशाला पाहिजे एक्स्ट्रा चावी वगैरे? आता बस बोंबलत...."  इति तुषार. हि आणि अशी आणखी काही वाक्य ऐकून घेण्याशिवाय माझ्या कडे दुसरा पर्यायच नव्हता. गुमान ऐकून घेत होतो आणि आता पुढे काय ? हा विचार करत होतो. पहिला विचार मनात आला "वाट लागली आता ट्रीपची.... गाडी चालू कशी करायची???  इथेच थांबावं लागतंय आता", पण भानावर आलो. पेट्रोल पंपावर चावी तयार करणारा कुठे मिळेल का? याची चौकशी केली तर समजलं, मागे ३ km पानिपत मध्ये एक आहे, तो मिळाला तर ठीक नाही तर नाहीच.. आली का पंचाईत....?. बरं परत उलटं, गाडी घेऊन जायचं तरी कसं??  गाडी ढकलत...??? शक्यच नाही. ३ km!!!  तेहि आहे त्याच्या पेक्षा २५-३० किलो जास्त वजन असलेलं धूड ढकलत कोण नेणार? डोक्यात चक्र गरागरा फिरत होतं. एकदा वाटलं तुषारला पाठवून त्यालाच(चावी वाल्याला) इकडे घेऊन यावं पण स्वतःचं दुकान सोडून कोण येणार एवढ्या लांब?  तुषार म्हणाला थांब आपण गाडी चालू करू, ते सुद्धा चावी न वापरता आणि घेऊन जाऊ चाविवाल्याकडे. हि आयडिया आवडली. त्याने लगेचच स्क्रूड्रायवर काढला, पुढचा दिवा उघडला आणि इग्निशन वायर शोधली. आता इग्निशन डायरेक्ट करायचे होते म्हणजे आणखी एक वायर हवी होती. ती कुठून आणणार?? असलं काही होईल अशी कल्पनाच नव्हती त्यामुळे आमच्या कडे ती नव्हती. म्हणून मग पेट्रोल पंप वाल्यालाच मागितली. कुठून तरी शोधून त्याने एक छोटीशी वायर आणून दिली (ती मी अजून जपून ठेवली आहे). ती वापरून इग्निशन चालू केलं, गाडी चालू झाली. अर्धी चावी अजूनही टाकीच्या झाकणातच होती. लगेच परत उलटा पानिपत मध्ये आलो. आम्ही दोघेही मिळून चावीवाला शोधत होतो. थोडं फिरल्यावर त्याचा ठावठिकाणा समजला आणि त्याला गाठला. किती बरं वाटलं त्याला पाहिल्यावर !!!. लगेचच दोन चाव्या तयार करायला सांगितल्या ( न जाणो परत अशी वेळ आली तर गडबड नको..). तुषारने पण त्याच्यासाठी आणखी एक चावी तयार करायला सांगितली.
 चाव्या तयार होतात तो पर्यंत मग शेजारच्या टपरी वर कटिंग मारली आणि पानिपतचा बाजार पहात बसलो. अजूनही पानिपत मध्ये माणसाने ओढल्या जाणाऱ्या रिक्षा वापरल्या जातात. रिक्षा ओढणारी ती  माणूसरुपी आकृती पाहून कोणालाही कीव येईल अशीच सगळी माणसं दिसत होती. हात पायाच्या कड्या झालेल्या तरी रिक्षा ओढत होते. मनात विचार आला जग कुठे चाललंय आणि हे शहर अजून एवढे मागे का? असो... या विषयावर पुन्हा कधीतरी... भर चौकात दोन काळ्या बुलेट थांबलेल्या असल्यामुळे, लोकं वळून वळून गाड्यांकडे आणि आमच्याकडे बघत होती. एक दोन जण जवळ येऊन चौकशी पण करून गेले. बोलता बोलता एकाने तर "तुम जो ये कर रहे हो,  इसमे समजदारी वाली बात कोई भी नाही"  असा शेरा पण मारला. मी हि त्याला "हम जो कर रहे है, उसमे छुपा हुआ मजा क्या है?? वो खुद किये बिना आपको समज नही आयेगा" असं सडेतोड उत्तर दिलं. पुढेही बरीच चर्चा झाली पण जाऊदेत. या सगळ्या उद्योगात एक दीड तास गेला आणि अखेर चाव्या तयार झाल्या.
 तडक निघालो चंडीगडकडे. पुन्हा पानिपत सोडल्यावर ५० -६० km नंतर एके ठिकाणी खाण्यासाठी थांबलो. आलूप्याज पराठा, दाल मखनी आणि दही. लाजवाब चव होती. माणसाने पराठा खावा तर हरयाणा, पंजाब मधेच. भरपेट खाऊन झाल्यावर जे निघालो ते डायरेक्ट चंडीगडलाच थांबलो. पानिपत - चंडीगड रोड एकदम चकाचक होता. एकही खड्डा नाही. कालच्या रस्त्यावर गाडी चालवण्याचा त्रास भोगला होता पण आज मात्र गाडी चालवण्याचा उपभोग घेत होतो. दुपारी १ ला चंडीगडला पोहोचलो. बुलेटच्या सर्विस सेंटरला आधीच फोन करून कळवलं होतं. चंडीगड म्हणजे एकदम नियोजन करून बांधलेलं शहर. सगळे रस्ते जवळ जवळ काटकोनात आणि सगळी कडे सेक्टर्स पाडलेले आहेत. तरी त्या नवीन शहरात सर्विस सेंटर शोधण्यात अर्धा तास गेला. अखेर ते मिळालं आणि आपली गाडी पुन्हा नवी होणार याचा आनंद झाला. त्या बरोबर तुषारला पुढच्या ब्रेकची नवीन लिवर मिळणार याचा त्याला जास्त आनंद झाला होता. बिचारा घरून निघाल्या पासून चार दिवस अर्ध्या लिवरवर ब्रेकचं काम भागवत होता. हात दुखत असून सुद्धा सहन करत होता. कृष्णाला फोन करून चंडीगड मध्ये दाखल झाल्याचं कळवलं.
  चांगले २-३ तास थांबून दोनीही गाड्या सर्विस करून घेतल्या. चमचम करणारी गाडी बघून खूप बरं वाटत होतं. कामावरून सुटल्यावर कृष्णा घ्यायला आला आणि मग आम्ही दोघे त्याच्या पाठोपाठ त्याच्या घरी गेलो. गप्पा रंगायला सुरुवात झाली. आम्ही जवळ जवळ १० वर्षानंतर भेटत होतो. कॉलेजच्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. गप्पा मारताना, फक्त एकच रात्र राहणार आहे हे कळाल्यावर गडी नाराज झाला पण परतीच्यावेळी पुन्हा चंडीगड मुक्काम दोन दिवस करेन असं सांगितल्यावर स्वारी खूष झाली. दोन दिवसात चंडीगडला पोहोचणार होतो पण चार दिवस लागले होते. जे काही ठरवलं होतं तसं काहीच होत नव्हतं. पण याची फिकीर कोणाला? लेहला जायचं, एवढं ध्येय होतं आणि आम्हाला फक्त तेच दिसत होतं (पक्षाच्या डोळ्याप्रमाणे). बाहेर जाऊन मस्त जेवण केलं, पुन्हा घरी आलो (यावेळी रूम नव्हती, घर होतं) आणि झोपलो. दिवसाची सांगता छान चांगली झाली होती.


क्रमश:


6 comments:

  1. जबरदस्त, अप्रतिम जे काय लिहिले आहेस त्याचे वर्णन करायला माझ्या कडे शब्दच नाहीत. तुषार ,समीर आणि यांच्या बरोबर मी पण आहे असेच वाटले मला सगळीकडे. एक महिना काम करेन जे लिहिले आहेस ते अप्रतिम आहे. तुझ्या बरोबर आता आम्हाला हे पण सफर घडणार तर खास..........पुढच्या भागाची चातका सारखी वाट पाहत आहे.

    ReplyDelete
  2. Khup Khup chan .... mala avadal.... mood ekdam change zala..... interesting....mastch....

    ReplyDelete